पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला IPL-2022 मध्ये सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मोसमातील 15 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने गुरुवारी दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला. पृथ्वी शॉच्या अर्धशतकानंतरही दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 3 गडी गमावून 149 धावा करता आल्या. यानंतर लखनऊने 2 चेंडू राखून 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत खूपच निराश दिसला आणि तो फलंदाजांवर संतापला.

दिल्लीकडून पृथ्वी शॉने 34 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत 39 आणि सरफराज खान 36 धावा करून नाबाद माघारी परतला. दोघांनीही ७५ धावांची नाबाद भागीदारी केली मात्र संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. लखनऊचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने 80 धावांची खेळी करत सामना पूर्णपणे आपल्या संघाकडे वळवला. आयुष बडोनीने विजयी षटकार ठोकला. सामनावीर ठरलेल्या डी कॉकने 52 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार ठोकले.

पराभवानंतर कर्णधार पंत म्हणाला, “जेव्हा दव असे असते तेव्हा तुम्ही तक्रार करू शकत नाही. बॅटिंग युनिट म्हणून आम्ही 10-15 कमी होतो, शेवटी आवेश खान आणि जेसन होल्डरने पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, याचे श्रेय त्यांना आहे.”

तो पुढे म्हणाला, “दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी संघाशी चर्चा झाली. आम्ही म्हणालो की सामन्याच्या 40 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आम्हाला 100 टक्के द्यावे लागतील, मग निकाल काहीही लागला तरी. पॉवरप्ले चांगला होता, आम्हाला एकही विकेट मिळाली नाही. आमच्या फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली पण शेवटी आम्ही 10-15 धावा कमी होतो. दिल्लीने मुंबई इंडियन्सचा 4 गडी राखून पराभव करून मोसमाची सुरुवात केली. त्यानंतर त्याला गुजरात आणि आता लखनऊकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आता 10 एप्रिलला त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *